वाघिणीच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 4 महिलांचा मृत्यू, जाणून घ्या नेमकं काय घडलं

चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यात एका वाघिणीच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. गुंजेवाही जंगल परिसरात ही घटना घडली.
तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी 13 महिला जंगलात गेल्या होत्या.
या महिला जंगलात तेंदूपत्ता तोडत असताना वाघिणीने अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर सर्व महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्या जीव वाचवण्यासाठी पळू लागल्या.
मात्र या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला. इतर महिलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
यातील एक महिला जीव वाचवत गावाच्या दिशेने धावत आली आणि तिने गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना 4 महिलांचे मृतदेह आढळून आले.
कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय- 45 वर्षे), अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय-46 वर्षे), संगीता संतोष चौधरी (वय-36 वर्षे), सुनीता कौशिक मोहुर्ले (वय-33 वर्षे) अशी या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने पथके घटनास्थळी रवाना केली. वाघिणीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
वन विभागाकडून या घटनेनंतर परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना जंगलात एकट्याने न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात असून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेषतः जंगलालगतच्या गावांमध्ये वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
गेल्या वर्षीही घडली होती अशीच घटना
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही सिंदेवाही तालुक्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 3 महिलांवर वाघाने हल्ला केला होता. त्या घटनेतही तिन्ही महिलांचा मृत्यू झाला होता.
मे 2025 या महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 9 जणांनी प्राण गमावले होते.
हे मृत्यू मागील काही वर्षांच्या मे महिन्यातील मृत्यूंपेक्षा जास्त आहेत. त्यााधीच्या काही वर्षांत मे महिन्यात 2 ते 3 लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, अशी माहिती वनविभागानं दिली होती.

मे 2025 मध्ये बीबीसी मराठीने या संबंधी एक सविस्तर बातमी केली होती. ती तुम्ही इथे वाचू शकता-
त्यावेळी वनविभागाने आकडेवारी देताना म्हटलं होतं की, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण 147 जणांचा मृत्यू झाला आहे. 2021 आणि 2022 मध्ये मृत्यूंची संख्या वाढलेली आहे, तर 2023 पासून ही संख्या कमी झालेली दिसतेय.
देशातही वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रात जास्त आहे. 2022 मध्ये एकट्या महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यांत 85 जणांचे मृत्यू झाले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2018 ते 2022 या 5 वर्षांत सर्वाधिक मृत्यू हे 2022 मध्ये झाले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















