नेपाळच्या हॉस्पिटल्समध्ये मृतदेह ठेवण्यासाठीही जागा नाही; साथीचे रोग पसरण्याची शक्यता

फोटो स्रोत, Subaas Shrestha/NurPhoto via Getty Images
- Author, बिनिता दाहाल
- Role, बीबीसी न्यूज नेपाली
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भयावह पुरानंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्याचं काम सुरूच आहे.
दरम्यान, पुराचा फटका बसलेल्या विविध ठिकाणी मृतदेह सापडल्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे.
चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी गणेश अर्याल यांनी शोध आणि बचाव कार्य सुरू असतानाच मृतदेहांची विल्हेवाट लावणं हे एक मोठं आव्हान बनलं असल्याचं सांगितलं.
चितवनमध्ये आतापर्यंत 178 मृतदेह सापडले आहेत. यामध्ये 74 पुरुष आणि 41 महिलांचा समावेश आहे. तर, आठ मुलांमध्ये सहा मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे, असंही त्यांनी सांगितलं.
"गुरुवारी सापडलेले बहुतांश मृतदेह कुजायला सुरू झाली होती. त्यामुळं साथीचा रोग पसरण्याचा धोका निर्माण झालेला आहे. अशा प्रकारचा उद्रेक रोखण्यासाठी मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावणं किंवा ते ठेवण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचं आव्हान वाढलेलं आहे," अशी माहितीही त्यांनी दिली.
सरकारी कार्यालयांमध्ये ठेवले जाताहेत मृतदेह
या प्रकरणातील पुढील कार्यवाहीबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, चितवन रुग्णालयात जागा नसल्यामुळे सरकारी कार्यालयात मृतदेह ठेवले जात आहेत.
त्याभागात उपस्थित असलेले बीबीसीचे प्रतिनिधी ईश्वर जोशी यांनी मृतदेहांमधून दुर्गंधी येऊ लागली असल्याची माहिती दिली.
"सध्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी जी खोली आहे, त्या खोलीसमोर मी उभा आहे. सापडलेले मृतदेह कुजण्याच्या अवस्थेत असल्याने इथे दुर्गंधी येत आहे," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Prakash MATHEMA / AFP via Getty Images
नेपाळच्या 'नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी'ने (NDRRMA) सांगितलं आहे की, भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 579 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 4000 लोकांची सुटका करण्यात आली आहे.
शुक्रवारी उशिरा संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या ताज्या माहितीनुसार, नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्यांची संख्या हजारांच्या घरात पोहोचली आहे.
बेपत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये नेपाळी नागरिक आणि परदेशी पर्यटकांचा, तसेच पोलीस, लष्कर, सशस्त्र पोलीस दल, सीमाशुल्क आणि इमिग्रेशन विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. बेपत्ता परदेशी नागरिकांची संख्या 517 इतकी आहे.
महासाथीला रोखण्यासाठी काय उपाययोजना?
नेपाळच्या गृह मंत्रालयानं म्हटलं आहे की, मृतांच्या संख्येत होत असलेली सततची वाढ पाहता, मृतदेहांच्या व्यवस्थापनाबाबत संबंधित जिल्ह्यांशी समन्वय साधला जात आहे.
गृह मंत्रालयाच्या उप-प्रवक्त्या रमा आचार्य सुबेदी यांनी बीबीसीला सांगितलं की, "रसुवा, नुवाकोट, धाडिंग, गोरखा, चितवन आणि नवलपरासी या जिल्ह्यांतून मृतदेह सापडण्याचं सत्र सुरूच आहे. त्यामुळे, या मृतदेहांचं व्यवस्थापन संबंधित जिल्ह्यांमध्येच करायचं की त्यांना एका मध्यवर्ती ठिकाणी आणायचं, यावर चर्चा सुरू आहे."

फोटो स्रोत, RSS
सुबेदी म्हणाले की, "जिथे कुठे मृतदेह सापडले आहेत आणि ज्यांचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे, त्यासाठीच्या पद्धतीबाबतही चर्चा सुरू आहे."
"व्यवस्थापन प्रक्रियेला गती देण्याबाबत चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या या विषयावर अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत."
साथरोगशास्त्र आणि रोग नियंत्रण विभागानं म्हटलं आहे की, बाधित जिल्ह्यांमध्ये आढळणाऱ्या मृतदेहांची वाढती संख्या ही महामारी संपवण्यासाठी एक आव्हान निर्माण करत आहे.

फोटो स्रोत, CCTV
विभागाचे संचालक डॉ. अनुज भट्टाचन यांनी सांगितलं की, मृतदेहांची ओळख पटण्यापूर्वी त्यांना दमट वातावरणात ठेवणं आवश्यक आहे आणि हे काम एक मोठं आव्हान ठरत आहे.
त्यांनी नमूद केलं की, मर्यादित क्षमता असतानाही मोठ्या संख्येनं येत असलेले मृतदेह आणि त्यांना अशा विशिष्ट परिस्थितीत साठवून ठेवण्याची गरज, यामुळे अडचणी अधिकच वाढत आहेत.
त्यांनी पुढे सांगितलं की, "धाडिंगमध्ये सापडलेले मृतदेह काठमांडू आणि पोखरा इथे पाठवावे लागण्यामागे हे देखील एक कारण होते. शिवाय, अनेक मृतदेह दयनीय अवस्थेत असल्याने, ओळख पटण्यापर्यंत त्यांना दीर्घकाळ 'कोल्ड स्टोरेज'मध्ये ठेवणं आव्हानात्मक ठरत आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























